शशिकांत वारिसे यांची हत्या टळली असती काय?

Unmesh Gujarathi
5 Min Read
12 FEB 2023 SPROUTS STORY PG1 2

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

रत्नागिरी येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र हा विरोध करणाऱ्या पत्रकाराची क्रृरपणे हत्या केली गेली. इतकेच नव्हे तर अशा असंख्य विरोध करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीसेसही पाठवण्यात आली. याविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अनेकदा हल्लेही झालेले आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांनी असंख्य तक्रारी केलेल्या होत्या. मात्र या तक्रारींना पोलिसांकडून कायमच केराची टोपली दाखवण्यात आली.

१२ सप्टेंबर २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जीवाला धोका आहे, असे नमूद केले होते. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे लेखी स्वरूपात दिले आहे. ‘यापुढे आमच्या संघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, स्थानिक विरोधकांवर हल्ला झाला व त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर उद्योगमंत्री उदय सामंत, स्थानिक आमदार राजन साळवी तसेच किरण सामंत आणि पंढरीनाथ आंबेरकर, सौरभ खडपे आदी लोकांना जबाबदार धरण्यात यावे, अशी तक्रार केली होती. मात्र या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. याविषयीची सविस्तर बातमी फक्त शशिकांत वारीसे यांनी १४ सप्टेंबर २०२२ रोजी ‘महानगरी टाइम्स’ या दैनिकात प्रसिद्ध केली होती.

काय होते प्रकरण?
दिनांक १२ सप्टेंबर २०२२ला राजापूर न्यायालय आवारात सामाजिक कार्यकर्ते आणि रिफायनरी विरोधी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र जोशी आणि दीपक जोशी तसेच इतर कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात कसेबसे वाचलेल्या या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात भूमाफिया पंढरीनाथ आंबेरकर आणि त्यांच्या गुंडांविरोधात तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही. परिणामी याच आंबेरकर आणि त्याच्या गुंडांनी पोलीस आवारात १३ सप्टेंबरला कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना ठार मारण्याच्या खुलेआम धमक्या दिल्या. खरेतर त्याचवेळी पोलिसांनी आंबेरकरसह त्याच्या गुंडांवर कारवाई केली असती तर पत्रकार वारिसे यांची हत्या झाली नसती. पण आंबेरकरवर उदय सामंत यांचा वरदहस्त असल्याने आणि पोलिसांवर दबाव असल्याने तपास यंत्रणा थंड बस्त्यात गेली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता दिलीप इनकर यांनी केला आहे.

सामंत यांच्या वाढत्या वर्चस्वाला खीळ बसण्याची शक्यता
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. मात्र या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगलेले आहे. हत्येनंतर ४ दिवसांनी त्यांनी माध्यमांना फक्त प्रतिक्रिया दिली. कारवाईचे आदेशही दिले नाहीत. याउलट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमची स्थापना केली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी या हत्येमधील प्रमुख आरोपी पंढरीनाथ आंबेरकर व पालकमंत्री उदय सामंत यांचा एकत्रित फोटो ट्विट केला आहे. या हत्येमागे सामंत हे मास्टरमाइंड असावेत, असे हे ट्विट सूचित करत असावे.

‘स्प्राऊट्स’च्या सूत्रानुसार या प्रकरणी उदय सामंत व त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या एकछत्री वर्चस्वाला या प्रकरणाला शह बसू शकतो. किरण सामंत यांचे राजकीय भवितव्य धोक्यात ‘आणण्याची’ शक्यताही वर्तवली जात आहे. असे झाले तर सामंत बंधूंच्या वाढत्या राजकीय व आर्थिक महत्वाकांक्षेला खीळ बसायला सुरुवात होवू शकते.

शशिकांत वारिसे यांच्याविषयी:
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची ६ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. वारीसे हे अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने पत्रकारिता करीत होते. ‘महानगरी टाइम्स’ या छोट्या दैनिकासाठी ते लिखाण करायचे. या दैनिकाच्या रत्नागिरी जिल्ह्याचे ते प्रतिनिधी होते. या जिल्ह्यातील प्रत्येक विभागामध्ये त्यांचे स्वतःचे ‘सोर्सेस’ होते.

मोदी सरकारने कोकणवासीयांवर लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांवर ते तुटून पडत. त्यांच्या बातम्या या स्फोटक परंतु विश्वासार्हता जपणाऱ्या असत. पत्रकारिता हे व्रत म्हणून मानणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र ते कधीही कोणत्याही अमिषाला बळी पडले नाहीत, की धमक्यांना घाबरून कधी खचले नाही. यापूर्वीही त्यांना पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासारख्या अनेकांनी धमक्या दिल्या. पण ते कुणालाही बधले नाहीत.

आर्थिक परिस्थितीही बेताचीच
राजापूर तालुक्यातील दुर्गम अशा कशेळी गावात शशिकांतचे घर आहे. या घरात केवळ ५ ते ६ माणसे बसू शकतील, एवढीच जागा. घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे, पण त्यांनी स्वाभिमानाने पत्रकारिता केली आहे.

कुटुंबामध्ये एकुलता एक यश नावाचा मुलगा, आई प्रचंड वयस्कर, तीही आता वयोमानाप्रमाणे अंथरुणाला खिळलेली. यशची आई तो चार वर्ष वयाचा असताना देवाघरी गेलेली होती. पुढेमागे पंढरीनाथ आंबेरकर हा इतर आरोपी इतर गुन्हेगारांसारखा सबळ पुराव्याअभावी किंवा अपघात दाखवून निर्दोष सुटेलही, कारण त्याला सत्ताधाऱ्यांचा आजही ‘आतून’ आशीर्वाद आहे. पण सध्या प्रचंड मानसिक तणावात असलेल्या १९ वर्षे वयाच्या यश व त्याच्या ७५ वर्षाच्या आईचे काय?

शशिकांत वारीसे यांच्या पत्रकारितेतील ध्येयवादाला ‘स्प्राऊट्स’चा मानाचा मुजरा

Share This Article
With over 28 years of experience, Unmesh Gujarathi stands as one of India’s most credible and courageous investigative journalists. As Editor-in-Chief of Sprouts, he continues to spearhead the newsroom’s hard-hitting journalism.
Past Editorial Roles:
•DNA (Daily News & Analysis) •The Times Group •The Free Press Journal
•Saamana •Dabang Dunia •Lokmat
Education:
•Master of Commerce (M.Com) •MBA •Degree in Journalism
Beyond his editorial leadership, Unmesh is a prolific author, having written over 12 books in Marathi and English on subjects such as Balasaheb Thackeray, the RTI Act, career guidance, and investigative journalism.
A regular contributor to national dailies and digital platforms, his work continues to inform, challenge, and inspire.
• A journalist. A leader. A voice for the people.